Last Updated:
सध्या सर्वच भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. भाजीपाला कवडीमोल भावाने विकावा लागत आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
सोलापूर : सध्या सर्वच भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. भाजीपाला कवडीमोल भावाने विकावा लागत आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील संतप्त शेतकरी कुमार पाटील यांनी एका एकरात लागवड केलेल्या चुका, पालक आणि कोथिंबीरवर तणनाशक फवारणी केली आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी कुमार पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील शेतकरी कुमार पाटील यांनी एका एकरात उसाची लागवड केली आहे. या उसात आंतरपीक म्हणून त्यांनी भाजीपाला लागवड केला होता. चुका, पालक, आणि कोथिंबीरची लागवड त्यांनी केली होती. भाजीपाल्याची काढणी करून शेतकरी कुमार पाटील यांनी 200 ते 250 पेंड्या विक्रीसाठी घेऊन गेले होते. तर बाजारात एका पेंडीला दोन ते तीन रुपये दर मिळत होते. म्हणून शेतकरी कुमार पाटील यांनी वैतागून या भाजीपाल्यावर तणनाशक फवारणी केली आहे.
शेतकरी कुमार पाटील यांना एका एकरात भाजीपाला लागवडीसाठी बियाणे, फवारणी आदी खर्च मिळून 15 हजार रुपये पर्यंत खर्च आला होता. या भाजीपाला विक्रीतून लागवडीचा सुद्धा खर्च निघत नसल्याची व्यथा शेतकरी कुमार पाटील यांनी मांडली.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि वादळी वारा आल्याने ते देखील एक संकट शेतकऱ्यांवर आहे. त्यामुळे कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
Solapur,Maharashtra
April 26, 2025 6:35 PM IST
भाजीपाल्याला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने केली तणनाशक फवारणी, खर्चही निघाला नाही